कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील वीजपुरवठा सुमारे सात तास बंद राहिल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सकाळी साडेदहा ते साडेपाच या काळात परिसरातील वीजपुरवठा बंद राहिल्याची माहिती या भागातील रहिवाशांच्या वतीने देण्यात आली.
या भागातील अनेक इमारतींमध्ये विजेअभावी समस्या उद्भवत असल्याने नागरिकांनी महावितरणविरोधात संताप व्यक्त केला. पाचपाखाडीतील महावितरणच्या केंद्रातील अचानक उद्भवलेल्या तांत्रिक कारणामुळे हा प्रकार घडला असून त्यामुळे या भागातील वीज बंद राहिल्याचे स्पष्टीकरण महावितरणच्या भांडुप परिमंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.