मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत बंद करण्यात आलेली राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे सहा महिन्यांनंतर ७ ऑक्टोबरपासून खुली करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्र वारी के ली. परंतु प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे.

शाळांपाठोपाठ सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी दिल्याने चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे वगळता राज्यात फारसे निर्बंध लागू नसतील. नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांनाही लवकरच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.  करोनाची दुसरी लाट आल्यावर गेल्या एप्रिलमध्ये सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खबरदारीचा  उपाय म्हणून बंद करण्यात आली होती. रुग्ण कमी झाल्याने प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, घटस्थापनेपासून म्हणजेच ७ ऑक्टोबरला राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

धार्मिक स्थळे बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत होते. करोनाचा संसर्ग कमी झाल्याने मंदिरे खुली करावीत, अशी मागणी करण्यात येत होती. भाजपने यासाठी आंदोलनही के ले होते. कर्नाटक, तमिळनाडूसह अन्य राज्यांमध्ये धार्मिक स्थळे खुली केल्याने राज्यातही प्रार्थनास्थळे खुली करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती.

करोना संसर्ग कमी झाल्याने शाळांबरोबरच मंदिरेही खुली करण्यास परवानगी देण्यात आली. गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर मार्चपासून दिवाळीपर्यंत सर्व धार्मिक स्थळे बंद होती. दिवाळीत सुरू झालेली धार्मिक स्थळे एप्रिलमध्ये दुसऱ्या लाटेत पुन्हा बंद करण्यात आली होती.

नियमांचे पालन आवश्यक!

धार्मिक स्थळे खुली केल्यावर तेथे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मुखपट्टी, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर बंधनकारक आहे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.