बारा डॉक्टरांचे मृत्यू

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आरोग्य विभागाचे अस्थायी डॉक्टर दुर्गम आदिवासी व नक्षलग्रस्त विभागात काम करीत असतात. मुसळधार पावसाची तमा न बाळगता आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेताना दुर्धर आजार अथवा अपघातात आजपर्यंत किमान १२ डॉक्टरांचे मृत्यू झाले आहेत. तथापि शासनाने या डॉक्टरांना ते केवळ हंगामी असल्यामुळे फुटकी कवडीही दिली नाही.  या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून ऊर फुटेस्तोपर कोणत्याही सुविधा न देता काम करून घ्यायचे, मात्र आरोग्यसेवेत कायम करायचे नाही, अशी क्रूर चेष्टा भाजप-शिवसेनेच्या राज्यातही सुरूच आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनीही गेली दोन वर्षे केवळ भूलथापा देण्याचेच काम चालविल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कामावर असताना एखादा पोलीस, अग्निशमन दलाचा जवान किंवा सीमेवरील जवानाचा मृत्यू झाल्यास त्यांना ‘शहीद’ घोषित करण्यात येते. त्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे लक्षावधी रुपयांची मदत केली जाते. मग एक दशकाहून अधिक काळ दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांवर आदिवासी रुग्णांची सेवा करताना आरोग्य विभागाच्या अस्थायी डॉक्टरांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर का सोडले जाते, असा अस्वस्थ करणारा सवाल या करण्यात येत आहे. तत्कालीन आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी पाठपुरावा केल्यामुळे ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान’ योजनेतून १८ हजार रुपये असे २४ हजार रुपये वेतन त्यांना देण्यात येते. हे सर्व डॉक्टर हंगामी असल्यामुळे कामावर मृत्यू झाल्यास त्यांना शासनाकडून फुटकी कवडीही मदत दिली जात नाही.

  • सध्या सोळा आदिवासी जिल्हय़ांमधील आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांवर तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुमारे ८२२ अस्थायी बीएएमएस डॉक्टर काम करीत आहेत. आयुर्वेदिक डॉक्टरांना हंगामी म्हणून वागणूक दिली जाते. गेली दहा वर्षे काम करणाऱ्या या डॉक्टरांना ५० हजार रुपये वेतन देण्यात येत अकरा महिन्यांनी त्यांची सेवा खंडित करून पुन्हा कामावर घेतले जाते.
  • पूर्ववत होताना अनेक ठिकाणी उपसंचालकापासून लिपिकापर्यंत संबंधितांना ‘लक्ष्मीदर्शन’ घडविल्याशिवाय पुढील कामाचा आदेश दिला जात नाही. गेल्या दहा वर्षांत त्यांना एकदाही पगारवाढ देण्यात आलेली नाही. याहून भयानक परिस्थिती नवसंजीवन क्षेत्रातील भरारी पथकात काम करणाऱ्या १७३ डॉक्टरांची आहे. या डॉक्टरांना आदिवासी विभागाकडून सहा हजार रुपये वेतन मिळते.

डॉक्टरांच्या मृत्यूचे दशावतार

तपासणीसाठी जाताना रुग्णवाहिकेच्या अपघातात मरण पावलेल्या डॉ. अरुण जंगले व डॉ. रोशन अहिरे यांना मदत का नाही? डॉ. राम हुमने यांचा चंद्रपूर येथील आरोग्य केंद्रात रुग्ण तपासतानमृत्यू झाला. डॉ. रविराम जरकर, डॉ. शैलेंद्र गणवीर यांचाही कामावर असताना हृदयविकाराने मृत्यू झाला तर डॉ. अरुण थोरात यांचा पाण्यात बुडून, डॉ. दिनेश पाटील यांचा अपघातात, या सर्वाना शासनाने मदत तर केली नाहीच, उलट अस्थायी डॉक्टरांनी आपल्या पगारातून पैसे गोळा करून त्यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या मदतीची चौकशी करण्याचे आदेश दिले.