महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांची घोषणा मुंबई : पुणे- शिर्डी- नागपूर विमानसेवा येत्या शुक्रवारपासून सुरू करणार असून पुणे- औरंगाबाद- नागपूर ही विमानसेवा १ मार्चपासून सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी जाहीर केले. राज्यातील विविध शहरांतील विमानतळांचा विकास व नवीन सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दीपक कपूर यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील विमानतळांच्या समस्या सोडविणे व विकास करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने निवेदनाद्वारे केलेल्या सूचनाबाबतही सकारात्मक विचार करून अंमलबजावणी करण्यात येईल व राज्यातील विमानसेवांचा कालबद्ध विकास केला जाईल अशी ग्वाही कपूर यांनी दिली. या बैठकीत ललित गांधी यांनी प्रामुख्याने कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र, कोकण , विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील शेतमालाला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय माल वाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. कोल्हापूर व रत्नागिरी विमानतळासाठी लागणारा निधी महाराष्ट्र सरकारकडून मंजूर केला जाणार आहे. शिर्डी येथे स्वतंत्र मालवाहतूक टर्मिनल उभारणार आहे. अमरावती येथील विमानतळासाठी भारत सरकारकडून ५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात ६.५ कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच अमरावती विमानतळासाठी महाराष्ट्र सरकारकडून अतिरिक्त २३ कोटी मिळणार असल्याचे दिपक कपूर यांनी सांगितले. नोव्हेंबर २०२२ पासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही दीपक कपूर यांनी सांगितल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे देण्यात आली. अन्य शहरांसाठी काय? कोल्हापूर व रत्नागिरी विमानतळासाठी लागणारा निधी महाराष्ट्र सरकार मंजूर करणार. शिर्डी येथे स्वतंत्र मालवाहतूक टर्मिनल उभारणार अमरावती येथील विमानतळासाठी केंद्राकडून ५२ कोटी रुपये मंजूर, पहिल्या टप्प्यात ६.५ कोटी रुपये प्राप्त