मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) रेल्वे स्थानक आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये बाटलीबंद ‘रेलनीर’ पाण्याचा पुरवठा केला जातो. अंबरनाथमधील ‘रेलनीर’च्या कारखान्यातून मध्य, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ‘रेलनीर’चा पुरवठा करण्यात येतो. मात्र, मागणीत वाढ झाल्यानंतर ‘रेलनीर’चा पुरवठा करण्यात आयआरसीटीसी अपयशी ठरली आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेच्या स्थानकांतील स्टॉलवरून ‘रेलनीर’च्या बाटल्या गायब झाल्या असून रेल्वे प्रशासनाने आता स्थानकांवर नऊ खासगी कंपन्यांना बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे.
गेल्या दोन महिन्यांत ‘रेलनीर’च्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, अंबरनाथ येथील कारखान्यात बाटलीबंद पाणी निर्मितीची उत्पादन क्षमता मर्यादित असल्याने तुटवडा जाणवला. रेल्वे स्थानकांत प्रवाशांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी रेल्वेच्या प्रत्येक स्टॉलवर रेल्वेने नियुक्त केलेल्या खासगी कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.