अवकाळीच्या सर्वकाळी संचारामुळे वातावरणात विचित्र बदल पुणे, मुंबई : अवकाळी पावसाच्या सर्वकाळी संचारामुळे सध्या दिवसातील तिन्ही प्रहरांत विचित्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. त्यातच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी देखील मुंबई, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक अशा काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांनंतर राज्यातील किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घसरण अपेक्षित आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी रविवारी पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. येथे जलधारा. पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे आणि नगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शनिवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. हवाभान. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. राज्यात दिवसभरात सर्वाधिक तापमानाची नोंद सांगलीत ३४.६ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान गोंदियात १०.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. कारण काय? देशाच्या उत्तर भागात सध्या पश्चिमी चक्रवात निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम हवामानावर होत असून उत्तरेकडील थंडीचा कडाका कमी झाला आहे. परिणामी राज्यातील वातावरणात बदल जाणवत आहे. रात्री-पहाटे बोचरी थंडी आणि काही भागांत दुपारी तीव्र उन अशी स्थिती अनुभवण्यास मिळत आहे.