मुंबई/कल्याण : मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे जिल्ह्यात मंगळवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. कल्याणमध्ये एका रिक्षावर झाड कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने आज, बुधवारीही मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांमधील पावसाचा इशारा कायम ठेवला आहे.

मंगळवारी रात्री ९.३० नंतर शहरात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. कल्याणच्या चिंचपाडा भागात रिक्षावर झाड कोसळल्याने एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची ओळखपटली नव्हती. नवी मुंबईतील नेरुळ, बेलापूर आणि खारघरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागात जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळत होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३४.१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

बुधवारीही मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात दिड किमी उंचीपर्यंत प्रत्यवर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी ४५ ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल झाला आहे. मध्य प्रदेशापासून मराठवाडा, तेलंगणा ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात असलेल्या पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार सुरुच आहेत. मंगळवारी अकोला येथे सर्वाधिक ४०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्याखालोखाल सोलापूर ४०.२ अंश, ब्रम्हपुरी ४० अंश, लोहगाव ३९.८ अंश, वाशिम येथे ३९.५ अंश व मालेगाव ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.