मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच वर्ष कधी ठरलं असा जाब विचारत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करून मतदारांशी गद्दारी केल्याचा आरोप केला. तसेच मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना काय शासन देणार? असा प्रश्न विचारला. ते गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित सभेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “करोना काळात पोलिसांनी जे काम केलं त्यांचे धन्यवाद. त्यांनी करोना होईल याची पर्वा केली नाही. जसा लॉकडाऊन विस्मरणात गेला, तशा अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. दोन वर्षातले आपण विसरलो, तसे दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटना पण आपण विसरलो. २०१९ ला झालेली विधानसभा निवडणूकही विसरलात. तुम्ही जे विसरता ते त्यांच्या फायद्याचं ठरतं.”

“निकाल लागल्यानंतर खास करून उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला. ते म्हणाले अडीच अडीच वर्षे ठरली होती. मग महाराष्ट्रात सभा झाल्या तेव्हा ते कधी बोलले का नाहीत. इथे मुंबईत मोदी यांची सभा झाली तेव्हा व्यासपीठावर होतात तेव्हा बोलला नाहीत. मोदी-शहा हे दोघे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. तेव्हा हे का बोलले नाहीत?”

हेही वाचा : Gudi Padwa Melava 2022 Live: “ते काही स्वातंत्र्यसेनानी नव्हते…”; राज ठाकरे कडाडले

“जेव्हा निकाल लागला तेव्हा सरकार आपल्यामुळे अडचणीत येऊ शकतं हे लक्षात आलं. तेव्हा अडीच वर्षाचा विषय काढला. त्यानंतर एकदा सकाळी उठतो काय, पहातो काय, जोडा वेगळाच. सालं पळून कोणाबरोबर गेली, लग्न कोणाबरोबर केलं हेच समजेना,” असं म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगावर हल्ला चढवला.