गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकाटिप्पणी केली. तसेच भाजप नेत्यांच्या सुरात सूर मिसळला. पण याच राज ठाकरे यांनी गेल्या काही वर्षांत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी वा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती. त्याच वेळी शरद पवार यांचे कौतुक केले होते. राजकीय समीकरणे बदलल्यानेच बहुधा एकेकाळी टीकेचे धनी झालेले फडणवीस आता राज ठाकरे यांची भूमिका बरोबर आहे असे बोलू लागले आहेत.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, माजी मुख्यमंत्री फडणवीस व राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेली काही विधाने :

* इतके खोटे बोलणारा पंतप्रधान बघितला नाही (ऑक्टोबर २०१७)

* मोदी पंतप्रधान असले तरी त्यांचे सारे लक्ष हे गुजरातकडे असते (मार्च २०१९)

* एक असतो बसलेला मुख्यमंत्री तर एक असतो बसविलेला मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा बसविलेला मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही. (सप्टेंबर २०१५)

* महाराष्ट्र गेली ६० वर्षे शरम्द पवार हे शरदचंद्र दर्शन करत आहे. ६० वर्षे सातत्य ठेवणे ही सोपी गोष्टी नाही. या वयात इतक्या व्याधी घेऊन फिरतात, काम करतात ही विलक्षण गोष्ट आहे. (फेब्रुवारी २०१८)

* लाव रे तो व्हिडीओ – मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारा सचित्र पुरावा (लोकसभा निवडणूक २०१९ च्या प्रचारात)

* ही कोणती लोकशाही. विरोधात बोलल्यास अशा पद्धतीने आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे.  ईडीच्या चौकशीनंतर माझे तोंड गप्प होणार नाही. ज्यांना धमक्या दिल्या ते भाजपमध्ये गेले. मला अशा नोटिसींचा काही फरक पडत नाही.  (ईडीच्या नोटिसीनंतर प्रतिक्रिया ऑगस्ट २०१९)

* कलम ३७० रद्द केल्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले. मग ज्या राज्यांमध्ये कलम ३७० नाही तेथे रोजगाराच्या संधी का उपलब्ध होत नाहीत. देशात बेरोजगारी वाढत आहे त्यावर मोदी काही बोलत नाहीत. ( ऑगस्ट २०१९)