ज्या माणसाने स्वत:चे संपूर्ण जीवन शिवआख्यान आणि शिवचरित्र लिहण्यात घालवले, त्या बाबासाहेब पुरंदरेंना आज महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागतंय, ही खूप दुर्दैवाची गोष्ट असल्याची खंत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ते रविवारी मुंबईत बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रभूषण सन्मानावरुन झालेल्या वादावरही भाष्य केले. काही जणांकडून बाबासाहेबांचा उल्लेख श्रीमंत म्हणून केला जातो. पण राजकारणामध्ये येऊन श्रीमंत झालेल्या व्यक्ती बाबासाहेबांवर बोटं उगारत आहेत. पण बाबासाहेबांनी मांडलेल्या इतिहासातील आक्षेपांवर चर्चा करायला कुणीही पुढे येत नाही. कारण त्यांना जातीपातीची लेबलं लावून फक्त आरोप करायचे आहेत. मराठ्यांचा इतिहास ब्राह्मणांनी लिहला किंवा ब्राह्मणांचा इतिहास मराठ्यांनी लिहला तर तो चुकीचा, असा प्रकार आपल्याकडे घडत आहे, असे राज यांनी म्हटले.

‘शिवकाळाच्या संशोधनासाठी अजून एक आयुष्य हवे’

बाबासाहेबांचा एकीकडे महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरव होतो. मात्र, दुसरीकडे इतिहासाचे काहीही ज्ञान नसलेले अडाणी लोक त्यांच्यावर आरोप करतात. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षणात महाराष्ट्रात फिरावे लागते, यासारखं दुर्दैव नाही, अशी खंत राज यांनी व्यक्त केली. विलेपार्लेमधील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त ‘शिवशाहीर सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हजेरी लावली होती.