ठाणे खाडी क्षेत्राला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी राज्याच्या कांदळवन कक्षाने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मान्यता दिली. हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. रामसर दर्जा मिळाल्यास पक्षी निरीक्षणासाठी देश विदेशातून पर्यटक आकर्षित होतील तसेच पर्यावरण व पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबत पाणथळ जागेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या संरक्षणास आणि संवर्धनास अधिक गती मिळतांना जागतिक पर्यटन नकाशावर देखील याची नोंद होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य १६.९०५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसलेले आहे. आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा पर्यावरणाबाबत महत्त्व असलेल्या क्षेत्रांना रामसर क्षेत्र असे म्हटले जाते. ठाणे खाडी परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर काही पक्षी-प्रजाती आढळतात. त्यामुळे या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा विशेष महत्त्व आहे. ठाणे खाडीच्या अंदाजे ६५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित असून त्यात १७ चौरस किलोमीटरमध्ये अभयारण्याचे क्षेत्र आहे. उर्वरित ४८ चौरस किलोमीटर ही जागा पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र म्हणून ऑक्टोबर २०२१ मध्ये अधिसूचित झाली आहे. त्यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार आहे.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ९ डिसेंबर रोजी झालेल्या राज्य पाणथळ प्राधिकरणाच्या बैठकीत ठाणे खाडी परिसर रामसर क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यानीही या प्रस्तावास मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी तो केंद्राला पाठविण्यात येणार आहे. या खाडीला रामसरचा दर्जा मिळल्यानंतर फ्लेमिंगोसह विविध पक्षी व प्रजातींचे अधिक संवर्धन होण्यास मदत मिळेल. महाराष्ट्रातील रामसर स्थळे पाणथळांसाठीच्या आंतरराष्ट्रीय रामसर अधिवेशनात नाशिक जिल्ह्यातील ‘नांदूर मधमेश्वर’अभयारण्यास जानेवारी २०२० मध्ये रामसर स्थळाचा दर्जा दिला गेला. हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये घोषित झालेले बुलढाण्यातील ‘लोणार’ सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ आहे. यानंतर ठाणे खाडीला रामसर स्थळाचा दर्जा मिळाल्यास महाराष्ट्रातील हे तिसरे रामसर स्थळ होईल. रामसर दर्जा म्हणजे काय? १९७१ मध्ये इराणमधील रामसर शहरात ‘रामसर परिषद’ झाली. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन आणि त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठीचा कृती आराखडाही तयार करण्यात आला. या आराखडय़ानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिकदृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘‘रामसर स्थळ’’ घोषित करण्याचे निश्चित करण्यात आले. पाणथळ जागेच्या कक्षेत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाडय़ा, समुद्र किनारे आदी जागांचा समावेश करण्यात आला.