भाजप सरकारच्या विरोधात मालमसाला असताना आरोप झालेल्या मंत्र्यांची कोंडी करण्यात काँग्रेसला पावसाळी अधिवेशनात यश आले नाही, अशी टीका होत असतानाच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपवर गुरुवारी जोरदार हल्ला चढविला. वादग्रस्त चिक्की खरेदीकरिता विरोधी पक्षनेतेपदी असताना एकनाथ खडसे यांनी शिफारस केली होती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडताना जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करून राणे यांनी यापुढील काळात सरकारच्या विरोधात आक्रमक राहणार असल्याचे स्पष्ट केले.
चिक्की खरेदीतील गैरव्यवहारांचा आरोप फेटाळताना सूर्यकांता संस्थेला काम देण्याचा निर्णय तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी घेतला होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत निदर्शनास आणून दिले होते. हे आरोप फेटाळून लावताना राणे यांनी, १ सप्टेंबर २०१२ रोजी तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीच या संस्थेला काम देण्याची शिफारस करणारे पत्र दिले होते, असे सांगत भाजपवरच हे प्रकरण उलटविण्याचा प्रयत्न पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री फडणवीस आणि खडसे यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरू असताना राणे यांनी चिक्की खरेदीच्या वादात खडसे यांना ओढले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या, पण त्यातील बरीचशी कामे आघाडी सरकारच्या काळात सुरू झाली होती. त्याचे श्रेय घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. गोरगरिबांना उपचार मिळावेत म्हणून राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू करण्यात आली व त्याचा राज्यातील लाखो गरजूंनी लाभ घेतला आहे. सत्ताबदल झाला म्हणून या योजनेचे नाव बदलण्याच्या सरकारच्या योजनेवर राणे यांनी टीका केली. राजीव गांधी यांचा त्याग व बलिदान याचा विसर पडता कामा नये, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला.
मुंबई-नागपूर असा ३० हजार कोटी खर्च करून द्रुतगती मार्ग बांधण्याच्या योजनेवर टीका करताना राणे यांनी, विदर्भातील किती जण वाहनाने मुंबईत येतात, असा सवाल केला. त्यापेक्षा मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्याची मागणी केली.

‘विरोधक आक्रमक हवे होते’
मंत्र्यांवर आरोप झाले असताना सभागृहात काँग्रेसचे आमदारही कमी पडल्याची भावना राणे यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या आमदारांनी अधिक आक्रमकपणे चिरफाड करायला पाहिजे होती. तसेच कामकाजावर बहिष्कार घालून पायऱ्यांवर बसण्यापेक्षा कामकाजात सहभागी होऊन सभागृह बंद पाडायला पाहिजे होते. स्वपक्षीय विरोधी पक्षनेते आणि आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली नाही, असे सांगत राणे यांनी पक्षात वाद ओढावून घेतला आहे.

शिफारस नाही -खडसे
मी सांगितल्यानुसार नारायण राणे यांनी निर्णय घेतले असतील तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत सूर्यकांता कंपनीला चिक्कीचे कंत्राट देण्याची किंवा ती खरेदी करण्याची शिफारस आपण केली नव्हती, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
सूर्यकांता कंपनीसाठी पत्र दिले होते का, हे आता आठवत नाही. पण कोणीही भेटले किंवा निवेदन दिले, तर ‘योग्य कार्यवाही करावी, ’ असे अभिप्राय लिहून संबंधित मंत्र्यांकडे पाठविण्याची पध्दत आहे. माझ्या सांगण्यानुसार राणे हे निर्णय घेत होते का आणि २०१२ मध्ये भ्रष्टाचार झाला आहे का, असा सवाल खडसे यांनी केला.