मुंबई : अकरावी प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी नव्याने संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून पहिल्याच दिवशीच दोन लाख एक हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. आधीचे दोन लाख ९० हजार असे मिळून एकूण पाच लाख विद्यार्थ्यांचे अर्ज भरून झाले आहेत. राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर अकरावी प्रवेशपरीक्षेच्या नोंदणीसाठी २० जुलैपासून संकेतस्थळ सुरू केले. मात्र पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणी आल्याने विद्यार्थ्यांना नोंदणी करणे शक्य झाले नाही. हीच परिस्थिती दुसऱ्या दिवशीही राहिल्याने अखेर राज्य मंडळाने हे संकेतस्थळ तात्पुरते काही कालावधीसाठी बंद केले होते. तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर अखेर सहा दिवसांनी, सोमवारी दुपारी संकेतस्थळ पुन्हा सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी org.in हे नवे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी दोन लाख एक हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी संकेतस्थळावर कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सीईटी परीक्षेसाठी तब्बल पाच लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही २० आणि २१ जुलैला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अर्जाचा तपशील पूर्वी अर्ज करताना नोंदवलेला मोबाइल क्रमांक टाकून org.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. पूर्ण अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज सादर करावा लागणार आहे.