मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मिनाझ मर्चंट लिखित ‘इकबाल सिंह चहल – कोविड वॉरियर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा सदस्य अनिल देसाई ‘महारेरा’ चे अध्यक्ष अजोय मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोविड काळातील आठवणींना उजाळा दिला.

“आजपर्यंत मी आयुक्तांचा चेहरा विनामास्कचा पाहिलेला नाही. मधल्या काळात पंचायत अशी झाली होती की, आपल्याला आपल्या काही हालचाली बदलाव्या लागल्या होत्या. हसताना आपले अंग हलवून हसतोय दाखवायला लागायचे. कारण मास्क घालून हसलो तर कळायचे नाही. त्यामुळे उगाच खांदे उडवायला लागायचे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“हा काळ इतिहास जमा होईल तेव्हा होईल पण या पुस्तकाच्या प्रति आजच काही जणांना घरी पाठवल्या पाहिजेत. एका वर्षापूर्वी याच दिवसांमध्ये सर्व प्रार्थनास्थळे बंद होती आणि फक्त ॲम्बुलन्सचे भोंगे वाजत होते. आता बाकीचे भोंगे वाजायला लागत आहेत. तेव्हा डॉक्टर, औषधे उपलब्ध नव्हती. मला मुख्यमंत्री पदाचा आणि जगाला कोविडचा अनुभव नव्हता. यावर अजून औषध सापडलेले नाही. त्यावेळी काय करायचे कोणालाच कळत नव्हते. दिवसेंदिवस रुग्ण वाढत गेले. त्यावेळी तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्याचे काम मी केले. कारण मुख्यमंत्री गर्भगळीत होऊन बसले असते तर राज्यच बसले असते. इक्बाल चहल हे काय मी बाहेरुन मागवलेली व्यक्ती नाही. त्यांच्यावर विश्वास टाकणे हे महत्त्वाचे काम होते,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

“आज सर्व हे चांगले वाटत आहे पण त्यावेळी आपण जे केले ते करुन घेणे गरजेचे होते. लॉकडाऊन करण्याआधी आम्ही केंद्राकडे गाड्या मागितल्या होत्या. तरीही लॉकडाऊन केला. त्यानंतर तांडेच्या तांडे निघाले. या सगळ्या गोष्टी त्यावेळी भयानक होत्या. एक लाट कशीतरी निभावली. पण तो काळ झोप उडवणारा होता,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“आज सर्व हे चांगले वाटत आहे पण त्यावेळी आपण जे केले ते करुन घेणे गरजेचे होते. लॉकडाऊन करण्याआधी आम्ही केंद्राकडे गाड्या मागितल्या होत्या. तरीही लॉकडाऊन केला. त्यानंतर तांडेच्या तांडे निघाले. या सगळ्या गोष्टी त्यावेळी भयानक होत्या. एक लाट कशीतरी निभावली. पण तो काळ झोप उडवणारा होता,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“पहिली लस घेतली तेव्हा कोविड गेल्यात जमा होता. पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरी लस घ्यायची होती. ते घेई पर्यंत आदित ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे कोविडग्रस्त झाले. त्यावेळी मला दडपण आले आणि २८ दिवसांमध्ये काळ बदलला. त्यावेळी आम्ही शेजाऱ्याला भेटावं तसं एकमेकांना भेटायचो. एकचा मला सकाळी इक्बाल सिंह चहल यांचा फोन आला आणि ते रडत होते. कालची रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र असल्याचे ते म्हणाले. सुदैवाने जे घडणार होते ते त्यांनी टाळले. त्यावेळी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किमान १५० लोक मृत्यूमुखी पडले असते. वेळेमध्येच त्यांनी सर्वांना दुसरीकडे हलवले त्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू आपल्याकडे झाला नाही,” असे मुख्यमंत्री म्हणाले.