मुंबई: करोनामुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील मालमत्ता कराचा दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मागील दोन-अडीच वर्षांच्या करोनाकाळाचा मोठा फटका सर्वच घटकांना बसला होता. टाळेबंदी तसेच करोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे अनेक लहान-मोठे उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, विकासाची कामे, कारखाने, बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे, दैंनंदिन रोजगार बंद होता. यामुळे सर्वसाधारण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याने मालमत्ता कर माफ करण्याची मागणी मुंबईकर, विविध संस्था, लोकप्रतिनिधींकडून महानगरपालिकेकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत यावर्षी मालमत्ता कराचे दर सध्या आहेत तेच कायम ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्याबाबतच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही सवलत दिल्याने महानगरपालिकेचे अंदाजे १११६ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मालमत्ता करात वाढ केल्यास त्याचा सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाला फटका बसला असता. हे टाळण्याकरिताच मालमत्ता करात वाढ करण्यात आलेली नाही.