देशभरातून हजारो विद्यार्थ्यांचे जंतरमंतर येथे आंदोलन
हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याला न्याय मिळवून देण्यासाठी देशभरातील विविध महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘प्रतिकार मोर्चा’ आयोजित करणार आहेत. या आंदोलनात मुंबईतीलही हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. रोहितच्या आत्महत्येला एक महिना उलटून गेला असतानाही केंद्र सरकारने जबाबदार व्यक्तींची चौकशी केली नसल्याने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
मुंबईतूनही सिद्धार्थ, आंबेडकर, कीर्ती आणि मुंबई-आयआयटी अशा अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थी त्याचबरोबर आंबेडकरी व डाव्या संघटनेचे कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना त्याबरोबरच देशभरातील विधितज्ज्ञ, शिक्षक संघटना, वकील, संशोधक, पुरोगामी आदी सहभागी होणार आहेत. २३ फेब्रुवारीला दिल्लीतील आंबेडकर भवन ते जंतरमंतपर्यंत असा हा प्रतिकार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, तर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या वस्त्यांमध्ये जनजागरण फेरीचे आयोजन केले आहे.
रोहित आत्महत्याप्रकरणी विशेष वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, रोहितची शिष्यवृत्ती त्याच्या कुटुंबीयांना तातडीने देण्यात यावी, त्याच्या भावाला कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, अशा मागण्या सादर केल्या जातील. तसेच जलसे, भारुडे, समर गीते या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी दलितांना भेडसावणारे प्रश्न जनतेसमोर मांडणार आहेत.

‘रोहित अ‍ॅक्ट’ची मागणी
शैक्षणिक संस्थांमध्ये जातिव्यवस्थेला प्रतिबंध व्हावा यासाठी ‘जातीयवाद प्रतिबंध कायद्या’ची मागणी करण्यात येणार आहे. नामांकित विधितज्ज्ञांनी या कायद्याचा मसुदा तयार केला आहे.
झारखंडमध्ये ४ नक्षलवादी ठार
रांची: झारखंडच्या नवादिह जंगलाजवळ सीमेलगत असलेल्या खेडय़ात गुरुवारी उशिरा रात्री सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या गटात झालेल्या चकमकीत एका महिला बंडखोरासह चार नक्षलवादी ठार झाले. रांचीपासून ३५ किलोमीटर अंतरावरील घाग्राबेडा खेडय़ात ही चकमक झाली.