आरटीओत ‘आरसीबुक’च्या कागदाची टंचाई
प्रादेशिक परिवहन कार्यालयात मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे वाहननोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) मिळवताना नागरिकांना दिरंगाईचा फटका बसत असताना आरसी बुकच्या मुद्रणासाठी आवश्यक असणाऱ्या कागदाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काळात वाहननोंदणी प्रमाणपत्र मिळवताना वाहनमालकांना पायपीट करावी लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, यात लोकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असल्याचे परिवहन खात्याकडून सांगण्यात आले.
सध्या ताडदेव, वडाळा, अंधेरी प्रादेशिक आणि बोरिवली उप-प्रादेशिक कार्यालयात दरदिवशी सुमारे ३०० ते ३५० वाहननोंदणी प्रमाणपत्र देण्यात येतात. म्हणजेच एका महिन्याला किमान आठ ते नऊ हजार वाहननोंदणी प्रमाणपत्र दिले जातात. सध्या या प्रक्रियेतही विलंब होत असल्याची ओरड होत आहे. त्यात येत्या काही दिवसांत आरसी बुकच्या मुद्रणासाठी लागणारा कागदच मुंबईसह राज्याच्या काही प्रादेशिक परिवहन विभागात उपलब्ध नसल्याचे समोर येत आहे. नाशिकच्या मुद्रणालयातून कागद उपलब्ध होत नसल्याने सध्या तुटवडा भासत आहे. मात्र सध्या शिल्लक असलेल्या कागदाची जिथे मागणी असेल तिथे पुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले.
नवीन नोंदणी झालेल्या वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आरसी बुक देण्यात येते. २००६ सालापर्यंत हे आरसी बुक प्रमाणपत्र कागदी पुस्तिकेच्या स्वरूपात दिले जात होते. मात्र कालातंराने तंत्रज्ञानातील बदल ओळखून प्रादेशिक परिवहन विभागाने हे प्रमाणपत्र स्मार्टकार्ड स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अगदी २००६ पासून स्मार्टकार्ड स्वरूपात आरसी बुक मिळायला लागले. मात्र हे स्मार्टकार्ड बनवण्यासाठी परिवहन विभागाने दिलेल्या कंत्राटाची मुदत २०१४ साली संपल्याने नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक देण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र गेल्या काही वर्षांत या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे वाहन नोंदणीधारक संताप व्यक्त करत आहेत. त्यात आता आरसीबुकसाठी लागणाऱ्या कागदाचीही टंचाई भासत असल्याने येत्या दिवसांत नागरिकांच्या त्रासात भर पडण्याची चिन्हे आहेत.

सध्या वाहननोंदणी प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदाची टंचाई आहे. मात्र नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात वाहन नोंदणीधारकांना हे प्रमाणपत्र स्मार्टकार्ड स्वरूपात देण्यासाठी यापूर्वी तीन वेळा निविदा काढली. मात्र निविदा काढली की, कोणीतरी न्यायालयात याचिका दाखल करतो. त्यामुळे वाहन नोंदणी प्रमाणपत्र नागरिकांना तातडीने मिळावे, यात अडचण निर्माण होत आहे. परंतु यावर लवकरच तोडगा काढला जाईल.
-दिवाकर रावते, राज्य परिवहन मंत्री