पावसाळा म्हटला की बेत ठरतात ते वर्षासहलीला जाण्याचे. मग कधी एखाद्या गडावर नाहीतर धरणाकाठी जाण्याला अनेक जण पसंती देतात. पुण्या-मुंबईला राहणाऱ्यांमध्ये तर लोणावळ्याला जाणे हे नेहमीचेच. यातही लोणावळ्याचा भुशी डॅम सर्वात प्रसिद्ध आहे. वाहतुकीचे सोयीचे मार्ग उपलब्ध असल्याने आणि लोणावळ्यातील आल्हाददायक वातावरण यामुळे नागरिक भुशी डॅमला पसंती देतात. मात्र या सगळ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. भिशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सायंकाळी बंदी करण्यात आली आहे. पावसाळ्यात आणि विकेंडला याठिकाणी होणारी गर्दी आणि अपघात यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच सुरक्षेच्या कारणास्तव संध्याकाळी सहा वाजल्यानंतर भुशी धरण आणि टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तसंच शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी लोणावळा गावात जाणाऱ्या लक्झरी बस, मिनीबस, टेंपो ट्रॅव्हलर यांसारख्या अवजड वाहनांवर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी नो पार्किंग झोनही तयार करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या वाहनांमुळे पुणे-मुंबई महामार्ग, भुशी रस्त्यावर प्रचंड कोंडी होते या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या नियमांमुळे गर्दी टाळण्यास मदत होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे. भुशी डॅम हे पर्यटकांचे कायमच आवडीचे ठिकाण असल्याने याठिकाणी मोठी गर्दी होते. ती टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल.