दिवाळीसाठी मातीचा किल्ला बनवताना विजेचा धक्का लागल्याने कल्याण येथील एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. अंकित लोणकर (वय १२, रा. राधेश्याम अपार्टमेंट, हनुमान नगर, कल्याण पूर्व) असे या मुलाचे नाव आहे.
दिवाळीची सुटी असल्याने अंकित हा गुरूवारी (दि. २७) सांयकाळी आपल्या मित्रांसमवेत मातीचा किल्ला बनवत होता. त्यावेळी विजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. अंकितच्या मृत्यूचा त्याच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला. अंकितला एक लहान बहिण आहे. ऐन दिवाळीतच अशी घटना घडल्याने लोणकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने हनुमान नगर परिसरात शोककळा पसरली आहे.