वांद्रे खेरवाडी येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय अश्विन चव्हाण याचा मृतदेह कुर्ला येथे बुधवारी सायंकाळी सापडला. अश्विनचा बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा अपघाती मृत्यू आहे की घातपात याचा तपास खेरवाडी पोलीस करत आहेत. वांद्रे (पू.) येथील संत ज्ञानेश्वर नगर येथून अश्विन चव्हाण हा १२ वर्षांचा मुलगा २९ जुलै रोजी शाळेत जात असताना बेपत्ता झालो होता. गतिमंद असलेल्या अश्विनचा ठावठिकाणा लागत नसल्याने तो हरविल्याची तक्रार खेरवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. बुधवारी सायंकाळी कुर्ला गार्डन परीग खाडी जवळ एक मृतदेह स्थानिकांना दिसला. अग्निशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढल्यानंतर कुर्ला पोलिसांनी केलेल्या तपासात तो अश्विनचाच असल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनात अश्विनचा मृत्यू बुडून झाल्याचे स्पष्ट होत आहे, असे खेरवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता पाटील यांनी स्पष्ट केले.