एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार केली आहे. आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला त्रास दिला जात आहे अशी तक्रार समीर वानखेडे यांनी दिली आहे. मागासवर्गीय असल्याने आपल्यावर खोटे आरोप केले जात आहेत. नागरी सेवा उत्तीर्ण होताना समीर वानखेडेंनी दाखवलेले जात प्रमाणपत्र हे खरे असून बदनामी करण्यासाठी कटकारस्थान रचले जात आहे अशी तक्रार त्यांनी केली आहे. आपण नागरी सेवेदरम्यान सादर केलेली प्रमाणपत्रे ही योग्य असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यात आलेली नाही. यामुळे जे आरोप केले जात हे त्यामुळे त्रास होत असल्याची तक्रार समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय आयोगाकडे दिली आहे. यासंदर्भात समीर वानखेडे यांनी जे खरे आहे ते समोर आणावे आणि योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची विनंती केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे केली असे एबीपी माझाने म्हटले आहे. तर दुसरीकडे समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी बुधवारी नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. यास्मिनने सांगितले की, मलिक त्यांना ऑनलाइन धमक्या देत आहे. यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवण्याची विनंती केली. त्यांनी आयोगाला यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. “नवाब मलिक यांनी माझ्यावर अनेक खोटे आरोप केले आहेत. माझ्या भावाच्या प्रामाणिक कर्तव्यात अडथळा आणण्यासाठी नवाब मलिक माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर खोटे आणि निराधार आरोप करत आहेत. ते पुढे म्हणाले की, नवाब मलिक माझ्या सोशल मीडिया हँडलवरून बेकायदेशीरपणे फोटो काढत आहेत,” असे यास्मिन वानखेडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, समीर वानखेडेंनी मुस्लिम असल्याचं लपवून नोकरीसाठी कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे त्यांनी नोकरी मिळवून एका मागासवर्गीयाचा हक्क हिरावून घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. या कागदपत्रांवर मला १०० टक्के खात्री आहे. मी दिलेली सर्व मूळ कागदपत्रे आहेत. जर ती बनावट असतील तर त्यांना मूळ कागदपत्रे दाखवून द्यावीत असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.