शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अंधश्रद्धांना खतपाणी मिळत आहे, अशी टीका केली. यानंतर आता शिंदे गटातील नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते मंगळवारी (१७ जानेवारी) मुंबईत माध्यमांशी बोलत होते. शंभुराज देसाई म्हणाले, "वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे राहायला जाणार होते. त्याआधी तेथे साफसफाई करण्यात आली. त्यावेळी तेथील लोकांनी सांगितलं की, वर्षा बंगल्यात पोतभरं लिंबू-मिर्च्या सापडल्या. त्याचीच आठवण संजय राऊतांना झाली असेल." "वर्षा बंगल्यातील पोतंभर लिंबू-मिर्च्या कोणाच्या होत्या?" "जेव्हा जुने मुख्यमंत्री जातात आणि नवे मुख्यमंत्री येतात तेव्हा साफसफाई, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती केली जाते. त्यानंतरच नवे मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी जातात. ही नेहमीची पद्धत आहे. एकनाथ शिंदे तेथे जाणार होते तेव्हा तेथील लोकांनी सांगितलं की, साफसफाई करताना पोतंभर लिंबू-मिर्च्या सापडल्या. मग आधी तिथं कोण राहत होतं? ते लिंबू-मिर्च्या कोणाच्या होत्या? हे आता माध्यमांनीच ओळखावं," असं सूचक विधान करत शंभुराज देसाईंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अंधश्रद्धांना खतपाणी" दरम्यान, संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे-फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते, "महाराष्ट्रात अंधश्रद्धांविरोधात कायदे करण्यात आले. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अंधश्रद्धांना खतपाणी मिळत आहे." "राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही" पांडुरंगाला साकडं घाला, त्यांच्या जीविताचं रक्षण होईल, या राऊतांच्या टीकेवर शंभुराजे देसाई म्हणाले, "सत्ताधारी, विरोधकांच्या किंवा सामान्यातील सामान्य व्यक्तीच्या जीविताचं रक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे यात राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही." हेही वाचा : Photos : “आम्ही ‘ऑपरेशनला’ सुरुवात केली होती, पण…”, शिवसेनेतील फुटीवर गिरीश महाजन यांचं मोठं विधान "कोणाच्याही जीवाला धोका असेल तर राज्य सरकारला सांगा" "ज्यांना कोणाला आपल्या जीवाला धोका आहे असं वाटतं त्यांनी राज्य सरकारला सांगावं. गृहविभागातील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती सर्व गोष्टी पडताळून पाहिली आणि संबंधित व्यक्तिच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेईल," असंही देसाई यांनी सांगितलं.