राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी अभिनेता शाहरूख खानने काहीही मदत केली नाही. त्यामुळे येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या त्याच्या दिलवाले चित्रपटावर बहिष्कारा घाला, असे आवाहन मनसेने केले. त्याला शाहरूख खानने लगेचच प्रत्युत्तर दिले असून, आम्ही एक चांगला चित्रपट घेऊन येत आहोत आणि प्रेक्षक तो नक्कीच बघतील, असा मला विश्वास आहे. जो काही वाद निर्माण झाला असेल तो मावळेल, असे त्याने म्हटले आहे. दिलवालेचे सध्या देशातील विविध शहरांत प्रमोशन सुरू आहे. अशा एका कार्यक्रमात त्याने मनसेच्या आवाहनाला प्रत्युत्तर दिले.
शाहरूख खानने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी काहीही मदत केली नाही. त्यामुळे त्याचा चित्रपट न पाहता ते पैसे अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ फाऊंडेशनला द्यावेत, असे आवाहन मनसेने केले.
चेन्नईमधील पूरग्रस्तांसाठी शाहरूखने नुकतीच एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, राज्यात यंदा भीषण दुष्काळ असताना दुष्काळग्रस्तांसाठी त्याने काहीही मदत केली नाही. त्यामुळेच त्याचा चित्रपट पाहू नये, असे आवाहन मनसेने केले आहे. प्रेक्षकांनी ते पैसे नाम फाऊंडेशनला द्यावेत, जेणेकरून दुष्काळग्रस्तांना मदत होईल, असेही पक्षाने म्हटले आहे.