राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच हा आश्चर्याचा धक्का असल्याचं म्हटलंय. "भाजपात दिल्ली किंवा नागपूरचा आदेश आला की तडजोड नसते. त्यामुळे फडणवीसांना त्या आदेशाचं पालन करावं लागलं आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी गेली," असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. शरद पवार म्हणाले, "राज्याचे ३८-३९ आमदार आसाममध्ये गेले होते. तेव्हा त्यांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची अपेक्षा उपमुख्यमंत्रीपदापेक्षा अधिक असेल असं वाटत नाही. मात्र, भाजपात दिल्लीचा आदेश असो, की नागपूरचा आदेश असो, तो आदेश आला की त्यात तडजोड नसते. हा आदेश आला आणि त्याचा परिणाम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली. त्याची कल्पना कुणालाही नव्हती. कदाचित एकनाथ शिंदे यांनाही नसावी." "दुसरं आश्चर्य म्हणजे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं" "दुसरं आश्चर्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं. खरंतर हे आश्चर्य नाही, कारण या कार्यपद्धतीत एकदा आदेश आला की तो तंतोतंत पाळावा लागतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जे मुख्यमंत्री होते, ५ वर्षे काम केलं, नंतर विरोधी पक्षाचं नेतृत्व केलं त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली," असं शरद पवार यांनी सांगितलं. शपथविधी सोहळा पाहा : "हा आश्चर्याचा धक्का, पण एकदा आदेश झाला आणि." "हा आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा आदेश झाला आणि सत्तेची कोणतीही संधी मिळाली की ती स्विकारायची असते. याचं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिलं आहे," असंही शरद पवार यांनी नमूद केलं.