राज्यातील काही भागावर पुराचं संकट ओढवलं आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना याचा फटका बसला असून, आता मदतीची मागणी होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पक्षाकडून केल्या जाणाऱ्या मदतीची घोषणा केली. यावेळी त्यांनी रायगडमधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्याबद्दलही भाष्य केलं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. राज्यातील काही जिल्ह्यांना पुराचा फटका बसला. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या मदतीबद्दल त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर सरकारच्या मदतीबद्दलही भाष्य केलं. “राज्यात सात आठ जिल्यात पूरस्थिती आहे. कोकणात घरांचं नुकसान झालं आहे. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आहे. सहा जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान झालं आहे. राज्य सरकार त्यांच्या कार्यक्रमानुसार मदत करेल. अहवाल आल्यानंतर राज्य सरकार सरकारकडून मदत जाहीर केली जाईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

संबंधित वृत्त- पूरग्रस्त भागातील दौरे टाळा; शरद पवारांचं राजकीय नेत्यांना आवाहन

“तळीयेत झालेल्या दुर्घटनेबद्दल बोलताना शरद पवार यांनी माळीण गावातील घटनेची आठवण करून दिली. “दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघातील माळीण गावात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सरकार आणि जनतेच्या मदतीनं गाव पुन्हा उभं केलं. पुनर्वसन कसं करतात याचं ते उदाहरण आहे. त्या अनुषंगाने तळीये गावाचंही पुनर्वसन केलं जाईल”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

संबंधित वृत्त- राष्ट्रवादी पूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना जीवनाश्यक वस्तू पुरवणार; शरद पवारांची घोषणा

यावेळी पवार यांनी राजकीय नेत्यांना पूरग्रस्त भागाचे दौरे न करण्याचंही आवाहन केलं. त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्याबद्दलही भाष्य केलं. “राज्यावरील आपत्ती मोठी आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं राज्याला मदत करावी. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यांचे केंद्राचे संबंध चांगले आहेत‌; ते जास्त मदत आणू शकतात, असं पवार यावेळी बोलताना म्हणाले.