मुंबई : साम्यवाद, समाजवादाचे क्रांतिकारी प्रणेते आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी लढा देणारे विचारवंत कार्ल मार्क्स यांची २०७ वी जयंती सोमवारी झाली. याच पार्श्वभूमीवर, शेतकरी कामगार पक्षातर्फे धारावीमध्ये मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. भंडाऱ्यात शाकाहारी आणि मांसाहारी पद्धतीचे जेवण ठेवण्यात आले होते. शेकडो नागरिकांना भंडाऱ्यात जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला.
मानवी समाजाच्या वर्गविभाजनाचा, कष्टकऱ्यांच्या शोषणाचा आणि भांडवली व्यवस्थेच्या अन्यायकारक रचनेचा अत्यंत सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून कार्ल मार्क्स यांनी जगाला मार्क्सवादाची ओळख करून दिली. मार्क्स यांच्या विचारधारेवर मुंबईत पाय रोवू पाहणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाने २०२३ मध्ये प्रथमच कार्ल मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त भंडारा आयोजित केला होता. एखाद्या विचारवंतांच्या जयंतीनिमित्त चक्क भंडाऱ्याचे आयोजन केल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
गेल्या वर्षी मार्क्स यांच्या जयंती कालावधीत मुंबईत निवडणुकांचा माहोल होता. तसेच, आचारसंहिता असल्याने भंडाऱ्याचे आयोजित करण्यात आला नाही. मात्र, यंदा पुन्हा मार्क्स यांचे विचार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची शेतकरी कामगार पक्षाने सोमवारी धारावीत भंडाऱ्याचे आयोजन केले होते. सुमारे २ हजार व्यक्तींच्या जेवणाचे नियोजन या भंडाऱ्यात करण्यात आले होते. शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही पद्धतीचे जेवण भंडाऱ्यात ठेवण्यात आले होते. अनेकांनी जेवणाचा आस्वाद घेत मार्क्स यांच्या विचारांची ओळख करून घेतली. दरम्यान, कार्ल मार्क्स यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध गाणी सादर करण्यात आली.
शेतकरी कामगार पक्ष कार्ल मार्क्स यांच्या विचारसरणीनुसार काम करतो. धारावीत गेल्या ४ वर्षांपासून पक्षाने तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचून काम केले आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या कामगिरीची धारावीकरांना ओळख आहे. त्यामुळे पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाभंडाऱ्याविषयी लोकांमध्ये पूर्वीपासूनच जागरूकता आहे. सर्व कष्टकरी एकत्र आल्यास जगात बदल घडू शकतो, मार्क्स यांच्या या विचाराला केंद्रस्थानी ठेवून भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या भंडाऱ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो, असे शेतकरी कामगार पक्ष प्रणित पुरोगामी विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा ॲड. सौम्या कोरडे हिने सांगितले.
एकीकडून कौतुक
दुसरीकडून टीका कार्ल मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त भंडारा आयोजित केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. समाज माध्यमांवर या भंडाऱ्याची चर्चा आहे. आता मार्क्स जयंतीनिमित्त जागरण, गोंधळाचाही कार्यक्रम ठेवावा, अशी मिश्किल टिप्पणी एका व्यक्तीने केली.