मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला होता, तो आता पूर्ववत झाला आहे. मात्र, याचा परिणाम मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलवरही झाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वीज पुरवठा खंडित झाल्यानं लोकलचा खोळंबा झाला व चाकरमान्यांना याचा फटका बसला. याचबरोबर विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण आणि जनतेचे अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने हाल झाले. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शिवाय, उर्जामंत्र्यांनी तातडीने याबाबत खुलासा करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

”राज्य सरकार नियोजनशून्य, व्यवहारशून्य आणि कल्पनाशून्य असल्याने आज विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण आणि जनतेचे अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने हाल झाले. याबाबत ज्या अधिकाऱ्यांचे नियोजन चुकले त्यांच्यावर कारवाई करा. उर्जामंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा.” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- Mumbai Powercut : फडणवीसांनी साधला महाविकास आघाडीवर निशाणा, म्हणाले…

आणखी वाचा- मुंबईत वीज पुरवठा खंडीत ! अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत होते.बेस्टनं यासंदर्भातील ट्विटरवरुन माहिती दिली होती. टाटाकडून करण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं होतं. मुंबईमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला.

आणखी वाचा- …आता फक्त एलियन दिसायचे राहिले आहेत, ते ही दिसतील! नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झालं. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीज पुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आलं. मात्र यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. तर, ज्या कारणामुळे तांत्रिक बिघाड झाला त्या कारणाची चौकशी होईल, असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.