चित्रपट अभिनेता संजय दत्तला शिक्षामाफी दिली जाऊ नये, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी संजय दत्तच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. शहरातील हजारो लोकांचे जीवन ज्या स्फोटांमुळे बरबाद झाले, त्यातील सर्व साक्षीपुरावे तपासून न्यायालयाने शिक्षा दिली आहे. तरी आता संजयच्या शिक्षामाफीची मागणी काही राजकीय पक्षाचे नेते आणि चित्रपटसृष्टीतील मंडळी करीत आहेत. गुन्हा सिद्ध झाल्यावर माफी म्हणजे गुन्हेगाराला सरकारने संरक्षण दिले, असे होईल. त्यामुळे शिक्षामाफी नको, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी विविध गुन्ह्य़ांसंदर्भात नियम २६० नुसार झालेल्या चर्चेच्या वेळी केली.