बेलापूर येथील नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयासमोर देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज लावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रध्वजाचा पहिल्यापासून अवमान करणाऱ्या प्रशासनाला शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी चांगलेच धारेवर धरले. पावसाळ्यात सुटणाऱ्या सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे हा राष्ट्रध्वज अधून मधून फाटत असून  तो वारंवार उतरवून बदलावा लागत आहे. आतापर्यत सात वेळा हा राष्ट्रध्वज फाटलेला असून फाटलेल्या स्थितीतही तो काही काळ नागरिकांना पहावा लागत होता.
त्यामुळे ध्वजाचा अवमान होत असल्याचा आक्षेप शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतला. राष्ट्रध्वजासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. यानंतर सातत्याने हा ध्वज फाटल्यास किंवा त्याची शिलाई निघाल्यास त्याचे रितसर छायाचित्रण करुन अधिकाऱ्यां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा या शिष्टमंडळाने दिला आहे.