मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावरच टीका करण्यास सुरुवात केली आहे. खासदार राऊत यांच्यामुळेच शिवसेनेवर ही वेळ आल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिंदे गटाचे आमदार गेल्या दोन दिवसांपासून मतदारसंघात परत येऊ लागले आहेत. मतदारसंघांत परतल्यावर बहुतांशी आमदारांनी एका सुरात संजय राऊत यांच्यावर टीका सुरू केली. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेचे नुकसान झाल्याचे या आमदारांनी म्हटले आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे नारदमुनी आहेत, अशी टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली. आम्हाला रेडा म्हणून डिवचता तर मी सांगोल्याचा माजलेला रेडा आहे. खाली शिंगाट घातलं तर तुला असाच उभा करीन. आमच्या नादाला लागू नका, अशा शब्दात सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार पाटील यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेवर आजची ही वेळ आली आहे. संजय राऊत यांच्यामुळेच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४० आमदार बाहेर पडले, असा आरोप माजी राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला. . प्रत्येक आमदाराला फुटण्यासाठी ५० कोटी दिल्याच्या राऊत यांच्या आरोपावर बोलताना त्यांनी पुरावा आहे काय अशी विचारणा केली. पैसे घेतल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून घरी बसेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी मंत्री संदीपान भुमरे यांनीही शिवसेनेतील सद्य:स्थितीस संजय राऊत यांना जबाबदार धरले. माजी मंत्री संजय राठोड यांनीही संजय राऊत यांनाच शिवसेनेतील बंडाला जबाबदार धरले. शिंदे गटातील आमदारांमध्ये परतण्याची भावना होती, पण संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे आमदार अधिकच बिथरले, असे राठोड यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे मुंबईतील मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचे शाखाप्रमुख, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला साथ देण्याचा निर्णय जाहीर केला. मुंबईतील आणखी काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही शिंदे यांच्याबरोबर जाण्याच्या तयारीत आहेत.