मुंबई : केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत प्रादेशिक आणि इतर विरोधी पक्षांना संपवण्याची भाषा सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी आणि शिवप्रेमातून शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती झाल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. त्याचबरोबर मराठी माणसाला असलेला दुहीचा शाप गाडून टाकू, असा निर्धारही ठाकरे यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ‘संभाजी ब्रिगेड’चे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. शिवसेना नेते सुभाष देसाई या वेळी उपस्थित होते. शिवसेना आाणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येऊन पुढची वाटचाल करावी. महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घ्यावेत. शेतकरी, आदिवासी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी एकत्र काम करावे, अशी इच्छा संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ती मान्य करीत शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा केली.

केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील प्रादेशिक पक्ष संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. हे कारस्थान म्हणजेच लोकशाही असे मानणारे लोक बेतालपणे बोलत आहेत. राज्यातील राजकीय उलथापालथीबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा संभाव्य निकाल देशात लोकशाही राहील की बेबंदशाही माजेल, याबाबतचा निर्णय असेल, असेही ठाकरे म्हणाले. आपल्या विचारांचे लोक आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे, असे मला अनेक जण सांगतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन मोठा इतिहास घडवू, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेकडे काही नसताना तुम्ही आमच्याबरोबर आला आहात. सत्ता पुढे येईलच. पण संघर्षांत जे एकत्र असतात त्याचे मोल जास्त असते. महाराष्ट्रात आज जे काही घडवले किंवा बिघडवले जात आहे ती महाराष्ट्राची ओळख नाही. शिवरायांचा महाराष्ट्र आहे असे काही जण म्हणतात पण तसे वागत नाहीत, अशी टीका ठाकरे यांनी भाजपवर केली. आमचे हिंदुत्व पटल्याने संभाजी ब्रिगेड शिवसेनेबरोबर आली आहे. महाराष्ट्राला दुहीचा शाप आहे. तो आपण गाडून टाकू, असा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला.

संभाजी ब्रिगेडच्या विचारसरणीबाबत पत्रकारांनी विचारले असता, गेली अडीच वर्षे किंवा आता जे घडले ते नसते घडले तर पाच वर्षे आम्ही काँग्रेससह यशस्वीपणे सरकार चालवले असते. काँग्रेसचा सर्वधर्मसमभाव आणि आमचे हिंदुत्व असे धोरण असताना सरकार चांगले चालले. त्यामुळे विचाराचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. यात मतभिन्नता किती आहे, यापेक्षा मतैक्य किती आहे याला महत्त्व आहे. राज्य घटनेच्या संरक्षणासाठी ही युती झाली आहे, असेही ठाकरे म्हणाले.

चांगले राजकीय समीकरण : आखरे

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीमुळे एक चांगले समीकरण तयार होणार आहे. संभाजी ब्रिगेड गेल्या ३० वर्षांपासून राज्यात काम करत आहे. राजसत्ता ही सर्वोच्च सत्ता आहे. व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी सत्तेत येणे गरजेचे आहे. त्यामुळे २०१६ मध्ये संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष झाला. आम्ही युती म्हणून विधानसभा, लोकसभेसह सर्व निवडणुका लढवणार आहोत, असे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदी असताना उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकारांचा विचार आक्रमकपणे मांडला. त्यांनी संघप्रणीत विषमतावादी विचारांना विरोध केला. ते लोकांच्या बाजूने कायम राहिले. संभाजी ब्रिगेडही लोकहित आणि महाराष्ट्राचे हित यासाठी काम करत आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो असून लवकरच एक महामेळावा घेणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी दिली.

ब्रिगेडचा कोणता गट?   

संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवीण गायकवाड यांचा आणि पुरुषोत्तम खेडेकर यांचा असे दोन गट आहेत. प्रवीण गायकवाड यांच्या गटाची प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक होती, तर खेडेकर यांच्या पत्नी भाजपच्या आमदार होत्या. शिवसेनेशी युती करणारे मनोज आखरे हे खेडेकर गटाचे आहेत. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत त्यांचा प्रभाव आहे. संभाजी ब्रिगेडच्या मराठवाडा गटाने शिवसेनेशी युती केली आहे.

‘असंगाशी संग संपला’

बरे झाले एकनाथ शिंदे माझ्यापासून दूर गेले, त्यामुळे माझा असंगाशी असलेला संग संपला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनुसार आजचा भाजप चालत आहे का? भागवतांनी मागील दोन-चार वर्षांत जी मते मांडली, त्यानुसार भाजपचे वर्तन आहे का, असा सवालही त्यांनी केला.

महाराष्ट्राशी संवाद..

मराठी माणसाला जो दुहीचा शाप आहे तो गाडण्याची सुरुवात केली आहे. आता सणांचे दिवस आहेत. ते संपले की दसऱ्याआधी आठवडाभर गटनेत्यांचा मेळावा आणि त्यानंतर दसरा मेळावा घेणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रभर फिरून लोकांशी संवाद साधणार आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena sambhaji brigade alliance decision preserve identity maharashtra uddhav thackeray ysh
First published on: 27-08-2022 at 00:02 IST