जे भारतमातेचा जय म्हणणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, असे सांगत शिवसेनेकडून खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. ओवेसींनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत गळ्यावर सुरा ठेवला तरी मी कदापि ‘भारत माता की जय’ असे म्हणणार नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. भारतीय राज्यघटनेने माझ्यावर तसे म्हणण्याचे बंधन घातलेले नाही, अशी पुस्तीदेखील त्यांनी जोडली होती. त्यांच्या या विधानानंतर देशभरात बराच गदारोळ पहायला मिळाला होता.
‘भारत माता की जय’वरुन जावेद अख्तरांचे ओवेसींना प्रत्युत्तर 
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील आजच्या अग्रलेखात ओवेसींवर टीका करण्यात आली आहे. आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी ‘भारतमाता की जय’ असे कधीच बोलणार नाही, असे ओवेसी म्हणतात. खरे म्हणजे अशा लोकांच्या गळ्यास फक्त चाकू कसला लावता? त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी, अशा शब्दांत सेनेने ओवेसींवर हल्ला चढवला. ओवेसी यांनी भारतमातेचा अपमान केला आहे. आता ओवेसीच्या विरोधात मुसलमानांनी भारतमातेचा जयजयकार करावा. जे भारतमातेचा जय म्हणणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, बेशक काढून घ्या, असे या अग्रलेखातून सांगण्यात आले आहे.
एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन, ठराव एकमताने मंजूर