scorecardresearch

शीव-ठाणे प्रवास सप्टेंबरपासून वेगवान, छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्प; उड्डाणपुलाचे ४५ टक्के काम पूर्ण

उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे शीव-ठाणे दरम्यानच्या जलद प्रवासाठी वाहनचालक-प्रवाशांना सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

thane mumbai bridge
छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्प; उड्डाणपुलाचे ४५ टक्के काम पूर्ण

मुंबई : ‘छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्पा’अंतर्गत शीव – ठाण्याला जोडण्यात येणाऱ्या मार्गावरील ६८० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे आतापर्यंत केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे शीव-ठाणे दरम्यानच्या जलद प्रवासाठी वाहनचालक-प्रवाशांना सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

 पूर्वमुक्त मार्गावरून अतिजलद वेगात येणाऱ्या वाहनांना छेडा नगर जंक्शनमधील वाहतूक कोंडीत अडकावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुमारे २५० कोटी रुपये खर्चाचा ‘छेडानगर वाहतूक सुधार प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत छेडा नगर येथे तीन उड्डाणपूल आणि एक सब-वे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिला तीन मार्गिकांचा पूल ६८० मीटर लांबीचा असून तो शीव आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावर आहे. दुसरा दोन मार्गिकांचा १,२३५ मीटर लांबीचा उड्डाणपूल मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावर आहे. तर तिसरा ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याला जोडण्यात आला आहे.

या प्रकल्पातील ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल मार्च २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. सब-वेही कार्यान्वित झाला आहे. तर १२३५ मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचेही काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या पुलाचे लोकार्पण बुधवारी, गुढीपाडव्याच्या दिवशी करण्याचा एमएमआरडीएचा मानस होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ न मिळाल्याने लोकार्पणासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधता आलेला नाही. मात्र, येत्या चार-पाच दिवसांत या पुलाचे लोकार्पण करण्याच्या तयारीत एमएमआरडीए आहे. असे असताना या प्रकल्पातील ६८० मीटर लांबीचा पूल पूर्ण होण्यास आणखी सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुळात शीव-ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यास विलंब झाला होता. ‘छेडानगर वाहतूक सुधार प्रकल्प’ २०१८ मध्ये हाती घेण्यात आला. मात्र ६७० मीटरच्या पुलाच्या बांधकामाला यादरम्यान सुरुवात करणे एमएमआरडीएला शक्य झाले नाही. कारण १२३५ मीटर आणि ६८० मीटर लांबीच्या पुलाचे काम एकत्र सुरू केल्यास वाहतूक कोंडी अधिक वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे एमएमआरडीएने आधी १२३५ मीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. तर ६८० मीटर लांबीच्या पुलाच्या कामाला वर्षभरापूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ४५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

१२३५ मीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण झाल्याने आता ६८० मीटरच्या पुलाच्या कामाला वेग देणे शक्य होणार आहे. हा पूल सप्टेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल, असे असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 10:18 IST

संबंधित बातम्या