उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ असं मोठं विधान शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पूजेसाठी दीपक केसरकर यांनीदेखील हजेरी लावली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. आजुबाजूच्या काही लोकांना उद्धव ठाकरेंनी दूर ठेवावं असा सल्लाही त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्यास सांगितलं तर जाणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

उद्धव ठाकरेंनी परत बोलावलं तर तुमची काय भूमिका असेल असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आम्ही आता भाजपासोबत सत्तेत आलो असून एक नवीन कुटुंब तयार झालं आहे. आता या कुटुंबामधून परत जायचं असेल तर आम्ही एकटे नाही. आम्हाला बोलावताना त्यांना भाजपाशीदेखील चर्चा करावी लागेल, आशीर्वाद द्यावा लागेल”.

“…तर मातोश्रीवर परत जाऊ,” बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या विधानाने खळबळ

जे घडलं त्यासाठी जबाबदार आहेत त्यांना पक्षातून काढू नका, पण थोडं तरी बाजूला ठेवा असा सल्लाही दीपक केसरकर यांनी यावेळी दिला. “अनेक लोक असे आहेत जे आम्ही कामं घेऊन जायचो तेव्हा आमच्याकडे ही कामं द्या, आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतो असं म्हणायचे. त्यासाठी आम्ही आमदार झालेलो नाही. आमचे मुख्यमंत्री आमचे प्रतिनिधी असतात. त्यांच्या हातात अर्ज दिल्यानंतर आम्हालाही योग्य व्यक्तीच्या हातात सोपवल्याचं समाधान मिळतं. कोणीतरी एजंट मधे य़ेऊन आमच्याकडे द्या सांगत असेल तर त्याला अधिकार नाही, तो फक्त मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे,” असंही केसरकर म्हणाले.

एकनाथ शिंदेंची भूमिका काय?

दरम्यान एकनाथ शिंदे यांनीदेखील या मुद्यावर बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्याची हाक दिल्यास जाणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ज्या प्रकारे आमच्यावर आरोप करत आहेत, पक्षातून काढलं आणि दुसरीकडे चर्चेसाठी माणसं पाठवली. आमचे पुतळे जाळण्यात आले, बदनामी करत आहेत, खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे ते पाहता त्यांना अशी अपेक्षा असेल असं वाटत नाही”.

“…तर मातोश्रीवर परत जाऊ,” संजय राठोड यांचं विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव होता. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असे खळबळजनक विधान शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर प्रथमच यवतमाळला आलेल्या आमदार संजय राठोड यांनी बुधवारी केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena deepak kesarkar on uddhav thackeray eknath shinde bjp devendra fadanvis sgy
First published on: 07-07-2022 at 13:38 IST