मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दोन मोठ्या घोषणा केल्या. महाराष्ट्र दिनी १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असून ५ जून रोजी सहाकाऱ्यांसमवेत अयोध्येला जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. दरम्यान राज ठाकरे औरंगाबादमध्ये ज्या मैदानात सभा घेणार आहेत तिथे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची सभा पार पडली होती. यामुळे या सभेची चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“अयोध्यामध्ये जाण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेना नेहमीच अयोध्येत जाते आणि आमचा संबंध राजकीय तसंच निवडणुकीपुरता नसून षडयंत्राचा भाग नाही. जेव्हापासून अयोध्येचं आंदोलन सुरु झालं तेव्हापासून शिवसेना आणि अयोध्येत श्रद्धेचं नातं आहे. सरकार नव्हतं तेव्हाही आम्ही जात होतो. शिवसेना आंदोलनात सहभागी होती. सरकार आल्यानंतरही मुख्यमंत्री दोन वेळा जाऊन आले आहेत. करोनामुळे मध्यंतरी आम्ही जाऊ शकलो नाही. रामलल्लाचं दर्शन घेणं कर्तव्य आहे. तिथे अजूनही कामं काढली आहेत त्याबद्दल तिथे जाऊन पाहू,” असं संजय राऊत म्हणाले.

‘नवहिंदू ओवैसी’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले “अशा लवंड्यांना..”

“प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद नेहमी शिवसेनेला मिळाला आहे कारण आमचं मन साफ आहे. आम्ही जे काही करतो ते राजकीय फायदा, तोट्यासाठी नाही तर श्रद्धेसाठी करतो,” असं संजय राऊतांनी सांगितलं. “श्रीरामाच्या चरणी कोणाला जायचं असेल तर साफ मानाने जाऊ शकतात. राजकीय कारणाने गेलात तर रामलल्ला मदत करणार नाही,” असं ते राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर बोलताना म्हणाले.

दरम्यान राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये सभा घेण्याचं जाहीर करत सरकारला आव्हान दिल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “सरकार आणि शिवसेनेला कोणतंही आव्हान नाही. मराठवाडा आणि खासकरुन संभाजीनगरमधील जनता नेहमीच शिवसेनेला समर्थन देत आली आहे. कोणाला सभा घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात. लोकशाही असून ज्याला जिथे सभा घ्यायची ते घेऊ शकतात”.

दिल्लीमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर राज ठाकरेंचा जाहीर इशारा; म्हणाले “समोर जे कोणतं हत्यार…”

“कोणाला बाळासाहेबांची कॉपी करायची असेल तर काय करणार…उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यात इतक्या सभा घेतल्या आहेत. कारण आम्हाला जनचेचं समर्थन आहे. उगाच दाखवावं लागत नाही. जर कोणी कोणाच्या स्पॉन्सरशिपने राजकारण करत असेल तर करु दे, शिवसेना नेहमीच आपल्या ताकदीवर देशाचं आणि राज्याचं राजकारण करत आलं असून करत राहू,” असंही यावेळी ते म्हणाले.

“देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांनी तयारीत राहा, आत्ता…”, राज ठाकरेंचं पुण्यातून आवाहन

राज ठाकरेंनी हिंदूंनी तयार राहावं म्हटल्यासंबंधी विचारलं असता राऊत म्हणाले की, “ही चर्चा आता संपली आहे. उगाच दळण दळत बसू नका. महाराष्ट्रात कमालीची शांतता आहे. जनता सुज्ञ आणि संयमी आहे. कोण काय करतंय आणि कोणाच्या सागंण्यावरुन हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला कळत आहे आणि ते पुरेसं आहे”.

मुंबई पालिका निवडणुकीत भाजपाकडून पोलखोल अभियान राबवलं जात असल्यासंबंधीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “जे स्वत: उघडे नागडे झाले आहेत त्यांच्याकडून पोलखोलची अपेक्षा काय कऱणार”.

भाजपाने शरद पवारांवर कारवाई करण्याची मागणी केल्यासंबंधी बोलताना त्यांनी, भाजपा काहीही म्हणू शकतो. त्यांच्या म्हणण्यावर राज्य चाललेलं नाही. कायद्याचं राज्य आहे आणि त्यानुसारच चालेल असं खडसावून सांगितलं.

आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्यांची सलग चार दिवस चौकशी होणार आहे. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “किरीट सोमय्या चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झाले आहेत. आता हा पोलीस तपासाचा भाग आहे आणि ते करत आहेत. आर्थिक गुन्हे विभाग सक्षम आहे. माझ्या माहितीप्रमाणे ईडी किंवा प्राप्तिकर विभागापेक्षा आमचे अधिकारी अधिक सक्षम आहेत. विक्रांत घोटाळ्यात पैसे कसे जमा झाले? त्या पैशांचं काय झालं? राजभवनात जाणाऱ्या पैशाला पाय कुठे फुटले? कोणाच्या खात्यात गेले? हे सगळं तपासात बाहेर येईल”.