नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीतील अपयशाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपबद्दल खोचकपणे सहानुभूती व्यक्त केली आहे. हाती सत्ता, धनसंपत्ती आहे म्हणून लोकभावना प्रत्येक वेळी विकत घेता येईलच असे नाही. शिवसेनेने या निवडणुकीत मुसंडी मारली आहे. मात्र त्याचवेळी भाजपची झालेली घसरगुंडी आमच्यासाठी वेदनादायी आहे. काही झाले तरी तो आमचा जुना मित्रपक्ष आहे, असे सांगत शिवसेनेने एकप्रकारे भाजपच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
भाजपसाठी धोक्याचा इशारा 
राज्यातील सहा नगरपंचायतींच्या १०२ जागांचे निकाल सोमवारी जाहीर झाले होते. यामध्ये भाजप थेट चौथ्या स्थानावर फेकला गेला होता. त्यामुळे लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत शत-प्रतिशतचा नारा देणाऱ्या भाजपला चार शब्द सुनाविण्याची आयती संधी शिवसेनेला मिळाली होती. ही संधी साधत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून भाजपवर शरसंधान साधण्यात आले आहे.
राज्यात बदलाचे वारे इतक्‍या लवकर वाहू लागतील असे वाटले नव्हते, पण नगरपंचायत निवडणुकांत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची जी धूळधाण उडाली आहे तो सर्व प्रकार धक्कादायकच म्हणावा लागेल. ज्या कॉंग्रेस पक्षाला लोकांनी उचलून आपटले होते त्या कॉंग्रेस पक्षाची मूर्च्छितावस्था जाऊन तरतरी यावी असे काही निकाल लागले आहेत.‘ तसेच “पंचायती, जिल्हा परिषदांचे निकाल म्हणजे महाराष्ट्राचे जनमानस नाही, असे खुलासे आता होतील. पण त्या लपवाछपवीस अर्थ नाही. केंद्रात भाजपचे राज्य एकहाती आल्यापासून ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत शत-प्रतिशत भाजपचा नारा देण्यात आलाच होता. इतकेच काय, देशातील प्रमुख विद्यापीठे व शैक्षणिक संकुलांतही भाजपने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यात रोहित वेमुलाची आत्महत्या झाली व कन्हैयाकुमारचा जन्म झाला. हेच यश मानायचे असेल तर शत-प्रतिशत मार्गी लागले असे म्हणायला जागा आहे, अशी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.
नगरपंचायत निवडणुकांत भाजपचा धुव्वा