पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ते ठाकर गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. तब्बल तीन महिन्यांनी संजय राऊत आर्थर रोड जेलमधून बाहेर आल्याने आदित्य ठाकरे संजय राऊतांच्या स्वागतासाठी 'मातोश्री'बाहेर उभे होते. या भेटीनंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीका केली. तसंच संजय राऊतांना पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात गोवलं जाऊ शकतं असा गंभीर दावा केला. “संजय राऊत यांच्या जामिनानंतर आनंद होणं याशिवाय दुसरी प्रतिक्रिया असू शकत नाही. या आनंदासह संजय राऊत यांच्या धाडसाचं कौतुक आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, सामनाचे कार्यकारी संपादक आहेत आणि त्याचबरोबर माझे जीवलग मित्रही आहेत. मित्र तोच असतो जो संकटाच्या काळात न डगमगता लढत असतो. तसा हा लढणारा मित्र आहे,” असं कौतुक उद्धव ठाकरेंनी केलं. तुम्ही नरमला आहात का? प्रश्न ऐकताच संजय राऊत म्हणाले “नेमकं म्हणायचं काय आहे, काय अर्थ…” पुढे ते म्हणाले, मी न्यायदेवतेचे आभार मानतो, निकालपत्रात स्पष्टपणे काही निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्याच्या अंगावर जा सांगत आहेत, त्याच्या अंगावर जात आहेत. बेकायदेशीरपणाने कारवाई होत असल्याचं संपूर्ण देश पाहत आहे. गेल्या काही दिवसांतील उदाहरणं आपल्यासमोर आहेत. "केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या वक्तव्यामुळे न्यायव्यवस्थाही आपल्या दबावाखाली आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याची शंका येत आहे. न्यायालय सर्वसामान्यांच्या आशेचा किरण असतं. पण न्यायालयच बुडाखाली घेण्याचा प्रयत्न सरकार करत असेल तर देशातील जनतेने याचा विरोध केला पाहिजे. न्यायदेवतेवर भाष्य करणं गुन्हा असताना केंद्रीय कायदामंत्रीच ते करत आहेत. हा गुन्हा आहे की नाही याची दखल न्यायदेवता घेईलच," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. संजय राऊतांच्या जामिनानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पाळीव प्राण्याप्रमाणे…” "आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करुन अनेक पक्ष फोडण्यात आले. अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. बेकायदेशीरपणे अटकेची कारवाई केली जात आहे. खोटे गुन्हे दाखल होत आहेत. न्यायालयाने केंद्र सरकारला काल दणका दिलेला असतानाही कदाचित खोट्या केसमध्ये संजय राऊतांना गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कारण चपराक दिल्यानंतरही लाज वाटण्याइतकं सरकार संवेदनशील असतं तर अशा घटना घडल्या नसत्या," असा मोठा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे.