मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांना राज्यात जनाधार किंवा मानणारा मोठा वर्ग होता किंवा आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक बाबतीत साम्य आहे. उभयतांना महाराष्ट्राची स्वबळावर कधीही सत्ता मिळू शकली नाही आणि दोघांनीही निवृत्तीची घोषणा करून माघार घेतली आहे. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली तेव्हा ते माघार घेणार नाहीत, अशी अटकळ व्यक्त केली जात होती. पण कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीनंतर पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेत पुन्हा अध्यक्षपदी कायम राहण्याची घोषणा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही निवृत्तीची दोनदा घोषणा केली होती. पण दोन्ही वेळेला त्यांनी माघार घेतली होती. ठाकरे शेवटपर्यंत शिवसेनाप्रमुख पदावर कायम होते. छगन भुजबळ यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या माधव देशपांडे यांनी शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला होता. तेव्हा संतप्त झालेल्या शिवसेनाप्रमुखांनी निवृत्तीची घोषणा केली होती. ठाकरे यांचे निवेदन प्रसिद्ध होताच हजारो शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ समोर गर्दी केली होती. शिवसैनिकांची आग्रही मागणी लक्षात घेऊन ठाकरे यांनी निवृत्तीची घोषणा मागे घेतली होती. १९७८ मध्येही पक्षाला चांगले यश मिळाले नाही तेव्हाही त्यांनी पद सोडण्याचे जाहीर केले होते. १९९५ नंतर राज्यात मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार सत्तेत असताना सरकारच्या कारभारावरून बाळासाहेबांनी नाराजी व्यक्त करत प्रसंगी शिवसेनाप्रमुख पदाचा त्याग करण्याचा इशारा दिला होता. तेव्हाही शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ बाहेर गर्दी करून बाळासाहेबांना पाठिंबा जाहीर केला होता. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा तीन दिवसांतच मागे घेतली. यावरून पवारांच्या नेतृत्वाच्या प्रतिमेला मात्र तडा गेला.