मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या भाजपाच्या पोलखोल अभियानाचा शेवट रविवारी मुंबईतील सोमय्या मैदावर झाला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धवजी ईद हा राष्ट्रीय सण कधीपासून झाला? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. “या सभेला बुस्टर डोस म्हणण्यात आलं आहे. या डोसचा मुंबईकरांसाठी अर्थ इशारा देणे आहे. ही सभा त्या अर्थाने महाविकास आघाडीसाठी डोस आहे. आता भाजपा जुनी राहिलेली नाही. तुम्ही मात्र जुनेच आहात. दुसरा डोस हा कार्यकर्त्यांसाठी आणि नागरिकांसाठी आहे. मी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारणार आहे. तुम्ही रोज उठून मी हिंदुत्वावादी असे म्हणत आहात. माहितीच्या अधिकारात माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सरकारला एक पत्र लिहिले होते. त्यात उत्तरात ईद या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने पगार लवकर देण्यात आल्याचे सांगितले. उद्धवजी ईद हा राष्ट्रीय सण कधीपासून झाला? या प्रश्नाचे उत्तर द्या,” असा सवाल चंद्रकांत पाटील विचारला. “शिवजयंती निमित्त लावलेले शाहिस्तेखानाचे पोस्टर उतरवण्यात आले आहेत. ते तुम्ही पुन्हा लावणार असाल तरच खरे हिंदुत्वादी असाल. तसेच तुम्ही गावोगावी अफजलखानाच्या वधाचे पोस्टर लावायला परवानगी देणार आहात का? तुम्ही शाली पांघरता असे म्हणता पण तुमचे सगळेच गळून पडले आहे. ते वाचवण्यासाठी तुम्ही रोज हिंदुत्ववादी असल्याचे म्हणता. कोल्हापूरच्या निवडणुकीत तुम्ही काँग्रेसला मतदान करण्यास सांगितले. तुम्ही अफजलखानाच्या वधाचे पोस्टर लावण्याची घोषणा केली की आम्ही तुम्हाला हिंदुत्ववादी म्हणू,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.