मुंबई: मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत विशेष तपास पथकाने (एसआयटी) दोन मध्यस्थांना अटक केली असून याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ व दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेचे ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप असून आरोपींशी संबंधीत ठिकाणांवर छापे मारण्यात आला होता.
केतन कदम व जय जोशी अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या माध्यमातून कंत्राट देण्यात आले होते. त्याबाबत बैठकांचेही आयोजन करण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत एसआयटी अधिक तपास करत असून मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मागील वीस वर्षांपासून हा प्रकल्प सुरू होता. एकूण१८ कंत्राटदारांना ११०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यातील अनेकांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक अभियंते प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे (निवृत्त), तसेच अॅक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात जोशी, कदम व पुरोहित मध्यस्थ आहेत.
आरोपींनी कट रचून पालिकेचे ६५ कोटी ५४ लाखांंचे नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचा तपास विशेष पथक करत आहे. सहपोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त आणि पोलीस निरीक्षक विशेष तपास पथकात सहभागी आहेत.याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील संबंधित सात ठिकाणी छापे टाकले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात विधान परिषदेत या प्रकरणी चौकशीची घोषणा करण्यात आली होती. भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर यांनी ही मागणी केली होती. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाला लक्ष्य करण्यासाठी हा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा आहे.
मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कंत्राटाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने महापालिका व एमएमआरडीएशी संपर्क साधला असून कंत्राटाच्या तपशिलांची मागणी केली आहे.नदीच्या उगमस्थळापासून पवई ते कुर्ला या ११ किमी ८४० मीटरच्या सफाईची जबाबदारी महापालिका व उर्वरित ६ किमी ८०० मीटरची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे. पोलिसांच्या चौकशीत या संपूर्ण कामांसाठी एकूण १८ कंत्राटदार आतापर्यंत नेमण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील पाच कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.