मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा आंतराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यात येणार असून त्यासाठी या उद्यानाचा तातडीने विकास आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनास दिले आहेत. याठिकाणी केवळ राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून वन पर्यटकांचा ओघ सुरू झाला पाहिजे त्यादृष्टीने हा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी दिल्या आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांना आकर्षित करणारे जगातील विविध उद्यानामधील पशु-पक्षी आणण्यासाठी प्रयत्न करावेत. या उद्यानात पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मुंबईच्या नागरिकांना जगातील उत्कृष्ट उद्यानाचा आनंद घेता येईल असे उपक्रम याठिकाणी राबविण्यात यावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या. विविध जातींचे सर्प संग्रहालय तयार करून त्यांची सविस्तर माहिती देण्यात यावी. काळा बिबटय़ा असे आपल्याकडे दुर्मिळ असणारे प्राणी या उद्यानात आणावेत. तसेच वाघांची, बिबटय़ा सफारीचा उपक्रम राबविण्यात यावे. होलोग्राफिक प्रोजेक्शन असे उपक्रम या उद्यानात राबविण्यात यावेत, असेही ठाकरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे उद्यान प्रदूषणमुक्त करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने आणावीत. चिल्ड्रन पार्क, बोटिंग, अद्ययावत शौचालयाची सुविधा याठिकाणी करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.