मुंबई : राज्यात सोमवारपासून ते ३० तारखेपर्यंत मतदार याद्या अद्ययावत करण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. नवमतदार, अपंग, तृतीयपंथी आणि विशेष करून जास्तीत जास्त महिलांची मतदार याद्यांमध्ये नोंद करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे याच्या अध्यक्षतेखाली विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यासंदर्भात ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असून जास्तीत जास्त महिला नवमतदारांची नोंदणी व्हावी, यासाठी निवडणूक विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी समन्वयाने काम करून शेवटच्या महिलांपर्यंत पोहोचून, मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन देशपांडे यांनी के ले. १३ व १४ नोव्हेंबर आणि २६ व २७ नोव्हेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येत असून १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.