हवामान बदलाच्या वाढत्या धोक्यांविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मुंबई क्लायमेट वीकच्या पूर्वतयारी कार्यक्रमात ‘इट्स ओन्ली 47°C’ या प्रभावी लघुपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. या उपक्रमातून शहरी भागातील वाढत्या उष्णतेचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर होणारा परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आला.
१७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होणार क्लायमेट वीक
१७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर येथे होणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भारतातील पहिल्यांदाच नागरिकांच्या सहभागातून आयोजित होत असलेल्या या परिषदेमध्ये शहरी लवचिकता, अन्न व्यवस्था आणि ऊर्जा संक्रमण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
शहरातील वाढत्या तापमानावर विशेष लघुपट
या लघुपटात अभिनेता शारिब हाश्मी यांनी ट्रॅफिक कॉन्स्टेबलची भूमिका साकारली असून, शहरातील वाढत्या तापमानाचा सामान्य कामगार वर्गावर होणारा विषम परिणाम वास्तवदर्शी पद्धतीने दाखवण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तेज सिसोदिया यांनी केले असून ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, अनुष्का शाह आणि हवामान तज्ज्ञ हरीश बोरा यांनी निर्मिती केली आहे. प्रसिद्ध गीतकार स्वानंद किरकिरे यांच्या कवितेमुळे चित्रपटाला भावनिक अधोरेखित मिळाले आहे.
शिशिर जोशी यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
या कार्यक्रमानंतर चित्रपटाच्या सर्जनशील टीम आणि हवामान तज्ज्ञांसोबत संवाद सत्रही आयोजित करण्यात आले. लोकप्रिय माध्यमांच्या माध्यमातून हवामान बदलाच्या समस्यांविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. प्रोजेक्ट मुंबईचे सहसंस्थापक आणि मुंबई क्लायमेट वीकचे संस्थापक शिशिर जोशी यांनी सांगितले की, हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्थानिक स्तरावर सुरू होणारे उपक्रमच मोठ्या बदलांना दिशा देऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
सिविक स्टुडिओज या महिलांच्या नेतृत्वाखालील निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हवामान बदलाच्या विषयावर प्रभावी कथा सांगण्याच्या उद्देशाने सिविक स्टुडिओज विविध माध्यमांद्वारे जनजागृती करत आहे. मुंबई क्लायमेट वीकच्या पूर्वतयारी कार्यक्रमांतर्गत ९ फेब्रुवारी रोजी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे ‘टर्टल वॉकर’ या चित्रपटाचेही विशेष प्रदर्शन होणार आहे. मुंबई क्लायमेट वीक हा उपक्रम मुंबईसह भारत आणि ग्लोबल साउथमधील हवामान कृतीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

