संदीप आचार्य मुंबई: दुर्धर आजार झालेल्या रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात विशेष उपचारांची (पॅलिएटीव्ह केअर) आवश्यकता असते. अशा रुग्णांची काळजी घेणे बऱ्याच वेळा घरच्यांनाही शक्य होत नाही. या रुग्णांना वेदना कमी करण्यासाठी मॉर्फिनची इंजेक्शन्स देण्यासह विशेष काळजी घ्यावी लागते. रुग्णांना यासाठी येणारा खर्च परवडणारा नसतो तसेच काळजी घेणेही शक्य होत नाही हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आता राज्यातील ३४ जिल्ह्यांत ही ‘पॅलेटिव्ह केअर’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने २०१२ मध्ये अशा उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचा आणि या व्यवस्थेतील डॉक्टर तसेच अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला होता. आरोग्य विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांनी या योजनेसाठी पुढाकार घेऊन इगतपुरीला उपचार व प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली होती. तसेच आरोग्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात ‘पॅलेटिव्ह सेंटर’ उभारण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा तसेच सातारा व नंदुरबार या सहा ठिकाणी ही केंद्रे २०१४-१५ पर्यंत सुरू करण्यात आली. यानंतर २०१८-१९ मध्ये नऊ जिल्ह्यांत ही योजना सुरू करण्यात आली. २०२२-२३ मध्ये कृती आराखडय़ात नागपूर, औरंगाबाद, जळगाव, लातूर, बीड, हिंगोली, ठाणे व अहमदनगर या आठ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला तर आता अकोला, बुलढाणा, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, रायगड, गोंदिया, धुळे व सोलापूर या जिल्ह्यांचा नव्याने समावेश करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार यांनी सांगितले.