मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव, चौंडीमध्ये आज, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे. अहिल्याबाईंच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून होणाऱ्या या बैठकीत परिसराचा कायापालट करण्याबरोबरच धनगर समाजाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या आग्रहावरून अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या गावात विशेष सुविधा उपलब्ध नसल्या तरी स्थानिक प्रशासनाने बैठकीसाठी सारी तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देणाऱ्या धनगर समाजाला खुश करण्याचा फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे. बैठकीत नाशिक कुंभमेळा प्राधिकरण, अहिल्याबाई यांच्यावर सर्व भाषांत चित्रपट, जिल्ह्यात वैद्याकीय महाविद्यालय असे काही निर्णय होण्याची शक्यता आहे.

चौंडीमधील मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा ठराव मंजूर करावा व केंद्र सरकारला पाठवावा. फडणवीस यांनी धनगर आरक्षणाबाबत बारामतीपासून नागपूरपर्यंत दिलेली आश्वासने समाज विसरलेला नाही. याविषयीचा अभ्यास यापूर्वीच झाला असून केवळ निर्णय व्हायचा आहे. – विक्रम ढोणे, धनगर समाजाचे नेते