केरळहून महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून आता अधिक वेगाने पुढे सरकत आहे. बुधवारी जोरदार पावसासह मुंबईत मान्सून दाखल झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत मान्सूनचे आगमन झाले आहे. रात्रीपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. अद्यापही अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु होती मात्र आता पावसाचा जोर वाढला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याच देखील सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल

महाराष्ट्रासह मुंबई आणि इतर भागात मंगळवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मुंबईत रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी मान्सूनचे मुंबईत आगमन झाले आहे. मुंबईत मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरवर्षी साधारणपणे १० जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होत असते. मात्र यावेळी त्याआधीच मुंबईत मान्सून दाखल झाला आहे अशी माहिती आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक (डीडीजी) डॉ. जयंत सरकार यांनी दिली आहे.

समजून घ्या : मान्सून नेमका ओळखायचा कसा? मान्सूनपूर्व आणि मान्सून पावसामधील फरक काय?

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये, विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, मुंबईत मान्सूनचे आगमन झाले आहे. मंगळवारीचा कुलाबा वेधशाळेने यासंदर्भात माहिती दिली होती. मान्सूनसाठी अनुकूल असं वातावरण आता निर्माण झाल्याचं देखील कुलाबा वेधशाळेनं स्पष्ट केलं होते.

सखल भागांमध्ये पाणी तुंबण्यास सुरुवात

मुंबईत मान्सनचे आगमन झाल्यानंतर आता शहर आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. दरम्यान, असाच पाऊस असाच सुरु राहिल्यास अनेक भागांमध्ये आणखी पाणी साचण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने ९ ते १३ जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता.

दरम्यान, केंद्रीय हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, नैऋत्य मोसमीव वारे लवकरच मुंबईसह महाराष्ट्राच्या उरलेल्या भागात, तेलंगणामध्ये आणि आंध्रप्रदेशमध्ये मार्गक्रमण करतील. त्याशिवाय ओडिशाचा काही भाग आणि पश्चिम बंगालमध्ये देखील काही भागांमध्ये येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, पश्चिमेकडच्या वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strong monsoon arrives in mumbai abn
First published on: 09-06-2021 at 09:24 IST