लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: इयत्ता दहावीच्या परीक्षेतील काही विषयांचे पेपर कठीण गेल्यामुळे तणावाखाली आलेल्या १५ वर्षीय मुलाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी चेंबूर परिसरात घडली. नापास होण्याच्या भीतीने या मुलाने आत्महत्या केल्याचे समजते. चेंबूर पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
आणखी वाचा- महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय जाहिरात: १४ गृहप्रकल्पांच्या विकासकांना ‘महारेरा’ची ‘कारणे दाखवा’ नोटीस
अनिकेत ठोंबे (१५) असे या मुलाचे नाव असून तो चेंबूरच्या विजय नगर परिसरात राहात होता. सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्याने अनिकेतला काही पेपर कठीण गेले होते. त्यामुळे त्याला नापास होण्याची भीती होती. परिणामी, काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. गुरुवारी रात्री त्याची आई घराबाहेर गेली होती. त्यावेळी अनिकेतने घरात गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळानंतर आई घरी परतली. यावेळी घर आतून बंद असल्याने तिने अनिकेतला हाक मारली. मात्र त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. यावेळी अनिकेत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.