अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने २०१४-१५च्या प्रवेश प्रक्रियेतून बाद ठरविलेल्या राज्यातील चौदा अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे कॅप राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. परिणामी या महाविद्यालयांत मोठय़ा प्रमाणात जागा रिकाम्या राहिल्या आहेत.
या महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने हंगामी एआयसीटीईच्या निर्णयाला हंगामी स्थगिती दिली आणि या महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्याचे आदेश राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाला दिले. त्याचवेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वत:च्या जबाबदारीवर या महाविद्यालयांत प्रवेश घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. अंतिम निकाल या महाविद्यालयांच्या विरोधात गेल्यास येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी तंत्रशिक्षण संचालनालय घेऊ शकणार नाही, असे संचालक सु. का. महाजन यांनी स्पष्ट केले होते.
न्यायालयाच्या भूमिकेची माहिती डिटीईने त्यांच्या वेबसाइटवर देण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली होती तथापि सिटिझन फोरम आणि वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाचा दणका दिल्यानंतर त्याची माहिती डिटीईच्या संकेत स्थळावर टाकण्यात आली. परिणामी कॅप राऊंड संपल्यानंतर नवी मुंबईतील दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात ११२ जागा रिकाम्या होत्या तर शीव येथील वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ११९, खारघरच्या जवाहर एज्युकेशनमध्ये १२९, कोपरखैरणे येथील इंदिरा गांधी अभियांत्रिकी मध्ये ७१, लोक मान्य टिळक अभियांत्रिकी कॉलेजमध्ये १३५, पनवेल येथील एमईएस पिल्लईमध्ये १३७ जागा रिकाम्या आहेत.
अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया १४ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.