मुंबई: भांडुप पश्चिमेच्या शिवाजी तलावाजवळ असलेल्या एका चायनीज हॉटेलला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र या घटनेत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले. सकाळी सहाच्या सुमारास हॉटेलमधून अचानक धूर येऊ लागल्याने स्थानिकांनी याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळवले. शिवाजी तलावाजवळील मुख्य रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र सकाळच्या सुमारास ही आग लागल्याने मोठी दुर्घटना टळल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र या आगीत हॉटेलमधील सर्व सामान जळून खाक झाले आहे.