शहरी नक्षलवाद प्रकरण : मुंबई : शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेल्या वकील सुधा भारद्वाज यांची अखेर तीन वर्षांनंतर सुटका होणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विशेष न्यायालयाने बुधवारी त्यांची पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक बंधावर सुटका करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने यावेळी जामिनासाठी अटीही घातल्या. गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव भारद्वाज यांना जामीन मंजूर केला. तांत्रिक कारणास्तव जामीन मिळण्यासाठी भारद्वाज या पात्र आहेत आणि त्यांना जामीन नाकारल्यास त्यांना घटनेने दिलेल्या जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन ठरेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले होते. त्याचवेळी भारद्वाज यांच्या जामिनाच्या अटी आणि त्यांना सोडण्याची तारीख निश्चित करण्यासाठी न्यायालयाने हे प्रकरण विशेष न्यायालयासमोर वर्ग केले होते. त्यानुसार भारद्वाज यांना बुधवारी विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांची पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक बंधावर सुटका करण्याचे आदेश दिले. त्यानंतर भारद्वाज यांचे मुंबईत काहीच नाही. त्या छत्तीसगड उच्च न्यायालयात वकिली करतात. परंतु गेल्या तीन वर्षांत त्यांनी वकिली केलेली नाही. त्यामुळे वकिलाचे पैसे देण्यासाठी त्यांना तेथे वकिली करण्याची परवानगी मिळावी तसेच मुंबई, दिल्ली आणि छत्तीसगड असा प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी भारद्वाज यांचे वकील युग चौधरी यांनीकेली. भारद्वाज यांच्या सुटकेला विरोध नाही. परंतु पुरावे नष्ट केले जाऊ नयेत यासाठी त्यांच्यावर जामिनाच्या अटी घालण्याची मागणी एनआयएतर्फे विशेष वकील प्रकाश शेट्टी यांनी केली. कठोर अटींसह जामीन भारद्वाज यांनी मुंबईतच राहावे आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय प्रवास करू नये. त्यांनी या प्रकरणाविषयी प्रसार माध्यमांमध्ये बोलू नये, व्हॉट्सअॅपद्वारे नजीकच्या पोलीस ठाण्यात हजेरी नोंदवावी, अशा अटींचाही न्यायालयाने भारद्वाज यांना घातलेल्या अटींमध्ये समावेश आहे. न्यायालयाने त्यांना काही नातेवाईकांना भेटू देण्याचीही परवानगी दिली आहे.